शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
कायद्याने साखर कारखान्यांनी, आर्थिक वर्ष समाप्ती नंतर 120 दिवसात हिशोब सादर करून, एकूण उत्पन्न निश्चित करायचे व त्यातील 70% रक्कम ऊस उत्पादकास व 30% रक्कम साखर कारखाना अशी त्याची विभागणी करावी लागते. या विभागणी सूत्रानुसार होणारी रक्कम सप्टेंबर महिना अखेरपर्यंतशेतकऱ्यांना देऊन 1 ऑक्टोबर पासून यावर्षीचा ऊस हंगाम सुरु करावा. या मागणीसाठी आज 15 सप्टेंबर रोजी आंदोलन अंकुश संघटनेने भव्य मोटर सायकल रॅलीचे आयोजन केलेले होते. या रॅलीमध्ये परिसरातील शेतकरी उत्फुर्थपणे सहभागी झाले होते.
रॅलीची सुरवात सैनिक टाकळी मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर गुरुदत्त साखर कारखान्याला निवेदन देण्यात आले. गुरुदत्त कारखान्याकडून शेती अधिकारी जाधव साहेब यांनी निवेदन स्वीकारले. पुढे रॅली दत्तवाड,घोसरवाड,हेरवाड मार्गे शिरोळ मध्ये आली. शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथे गादीला हार घालून, दत्त कारखान्याला निवेदन देण्यात आले. दत्त कारखान्याकडून एमडी पाटील साहेबांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर जयसिंगपूर मध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद साखर च्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी रॅली गेली. परंतू सदर निवेदन स्वीकारण्यासाठी जबाबदार व्यक्ती कोणीच नसल्यामुळे, आंदोलकांनी यड्रावकरांच्या कार्यालयाबहेर ठिय्या मारला. त्यामुळे थोडावेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील, उदय होगले, नागेश काळे,संभाजी शिंदे यांच्यासमवेत शेकडो आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
दुसरा हप्ता द्या... आंदोलन टाळा :
साखर कारखान्यांना हंगामा च्या तोंडावर होणारे ऊस दराचे आंदोलन टाळायचे असेल तर, आपल्या भागातील सर्व शेतकरी संघटनाना बोलावून, कारखान्यांनीच पुढाकार घेऊन तातडीने बैठक लावावी व दराचा विषय मिटवावा. अशीही विनंती आम्ही कारखान्यांना निवेदन देऊन केली असल्याचे, धनाजी चुडमुंगे यावेळी म्हणाले, ते पुढे म्हणाले की,
साखर व उप पदार्थ उच्चदराने विकला, मग उसाला कमीत कमी किंमत का देता...?गेल्या वर्षभरात साखर दर 4000 च्या आसपास मिळाला. बग्यास 4000 रुपये टनाने विकला. तर मळी पण 16000 रुपये टनाने गेली. म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासातील उच्चदराने कारखान्यांनी पक्के माल विकले. पण कच्च्या मालाच्या उत्पादकास मात्र कमीत कमी दर म्हणून एफ.आर.पी. वर भागवले जात आहे. ते आम्हाला मान्य नाही. कारखान्यांना झालेल्या नफ्यातील वाटा आम्हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हिच आमची भूमिका आहे.
टिप्पणी पोस्ट करा