अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधात रविवारी १८ मे रोजी अंकली टोल नाक्यावर सर्व पक्षीय चक्का जाम आंदोलन....





शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



अलमट्टी धरणाची सध्याची 519 मीटर असलेली उंची वाढवून ती 524 मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकार केंद्र सरकार कडे मागणी करत आहे. केंद्राने उंची वाढवण्यास परवानगी देऊ नये, म्हणून आपलं राज्य सरकार कायदेशीर विरोध करायला तयार नाही. त्यामुळे सरकारला जागं करण्यासाठी व अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधात रविवारी अंकली टोल नाक्यावर सर्व पक्षीय चक्का जाम आंदोलन केले जाणार असून सर्व पक्ष, संघटना मिळून एकजुटीने या धरणाच्या उंचीचा कर्नाटक चा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार काल शिरोळ येथे करण्यात आला.






शासकीय विश्रामधाम,शिरोळ  येथे शिरोळ तालुक्यातील सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली. त्यामध्ये रविवारी गट, तट पक्ष, संघटना विसरून पूरग्रस्त म्हणून सर्वांनी अंकली येथील चक्का जाम आंदोलनात सामील होण्याचे आवाहन सर्व पक्षीय नेत्यांकडून करण्यात आले. या बैठकीचे नियोजन आंदोलन अंकुश संघटनेकडून करण्यात आले होते. यावेळी पदवीधर मतदारांचे आमदार श्री.अरुण लाड, दत्त कारखान्याचे माजी चेअरमन श्री.गणपतराव दादा पाटील,शिरोळ चे माजी नगराध्यक्ष श्री.अमरसिंह माने पाटील भैय्या, आंदोलन अंकुश चे प्रमुख श्री. धनाजी दादा चुडमुंगे, माजी आमदार उल्हास दादा पाटील, आमदार पुत्र आदित्य पाटील यड्रावकर, शिवसेनेचे वैभव उगळे, स्वाभिमानीचे सावकार मादनाईक, शैलेश आडके, आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे, दीपक पाटील, कृष्णा देशमुख, संभाजी माने. आनंदा भातमारे, प्रकाश बावडेकर, डॉ.शिवाजी पाटील, रयत क्रांतीचे शहाजी गावडे, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे सर्जेराव पाटील, ओंकार दिवाण  याचबरोबर शिरोळ तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.




अलमट्टी धरणात 519.66 मीटर उंचीने प्रथमच पाण्याची पातळी 2005 मध्ये केली आणि त्याच वर्षी महाराष्ट्रात महापूर आला, त्यानंतर सरासरी पेक्षा जादा पाऊस ज्या ज्या वेळी पडला, त्या त्या वर्षी सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आलेला आहे. या भागात लागोपाठ येणाऱ्या महापुरास अलमट्टी धरण जबाबदार असल्याचे अनेक अहवाल शासनास सादर झाले आहेत. पण सरकार याकडे म्हणावे तितके लक्ष देत नाही, म्हणूनच कर्नाटक सरकार यावर कहर म्हणून या धरणाची आणखी उंची वाढवून मिळावी म्हणून युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.







लागोपाठ महापूर येऊन या भागाचे आर्थिक सामाजिक नुकसान होउनही सरकार या महापुरास कारणीभूत असलेल्या या धरणाबाबतीत गाफिल आहे, म्हणून या भागातील नागरिकांना आंदोलन करून सरकार चे लक्ष या गंभीर धोक्याकडे वेधण्यासाठी म्हणून, हे चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.असे आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे म्हणाले. 



ताकदीने आंदोलन केल्याशिवाय सरकार जागं होत नाही, नेते जागे होत नाहीत. त्यामुळे चक्का जाम आंदोलनात जास्तीत जास्त पूरग्रस्तांनी सहभागी व्हावे. असे आवाहन पदवीधर चे आमदार अरुण लाड यांनी केले. 



महापुराचा जास्तीत जास्त फटका सर्वच बाबतीत शिरोळ तालुक्याला बसत असल्यामुळे अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधातील हे चक्का जाम आंदोलन सर्वांनी मिळून यशस्वी करावे, असे दत्त कारखान्याचे गणपतराव दादा पाटील म्हणाले. 



तसेच  सरकार अलमट्टी धरणाच्या उंची वाढीचा निर्णय रद्द करत नाही, तोपर्यंत हे सर्व पक्षीय आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तालुक्यातील तमाम पूर बाधित नागरिकांनी रविवारी 18 मे रोजी सकाळी 10 वाजता अंकली टोल नाका येथे आपल्या वाहनासह येऊन चक्का जाम आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन सर्व पक्षीय संघर्ष समिती कडून शेवटी करण्यात आले. त्याचबरोबर आज गुरुवार दिनांक १५ मे रोजी दत्त कारखान्यावर चक्का जामच्या शिरोळ तालुक्याच्या नियोजनासाठी सर्व पक्षीय बैठक बोलविण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने