अलमट्टी धरणाच्या डॅम इन्चार्ज ला कायदेशीर जबाबदार धरा : धनाजी चुडमुंगे




प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



केंद्रीय जल आयोगाने पावसाळ्याच्या काळात अलमट्टी धरणात किती पाणी साठा करावा, या बाबतच्या मार्गदर्शक सूचना धरण प्राधिकरणास घालून दिल्या आहेत. त्या मार्गदर्शक सूचना पाळण्याची कायदेशीर जबाबदारी ही अलमट्टी डॅम इन्चार्जची आहे. या पावसाळ्यात अलमट्टी धरणात नियमबाह्य पाणी साठा केल्यास अलमट्टी डॅम इन्चार्ज ला दररोज कायदेशीर नोटीस काढा. अशी मागणी आंदोलन अंकुशच्या धनाजी चुडमुंगे यांनी पाटबंधारे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांच्याकडे केली आहे.



अलमट्टी धरणाच्या उंची वाढ बाबतीत काल कोल्हापूर सिंचन भवनात बैठक पार पडली. त्या बैठकीत बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले की कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात अलमट्टी धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या धरणातील पाणी साठा व पाणी विसर्गाचे नियोजन करन्याबाबतीत केंद्रीय जल आयोगाने या धरण प्राधिकरनास मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत व त्याचे तंतोतंत पालन करून धरणाच्या मागील बाजूस नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिलेले असताना, पाण्याच्या अति हव्यासा पोटी धरणात अतिरिक्त पाणी साठा करून महाराष्ट्रात निर्माण होत असलेल्या पूर परिस्थितीला हा पाणी साठा कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी पुराव्या सह निदर्शनास आणले. 



यावर्षी च्या पावसाळ्याच्या काळात या धरणात नियमबाह्य पाणी साठा केल्यास अलमट्टी धरणाच्या डॅम इन्चार्ज ला थेट जबाबदार धरून कायदेशीर नोटीस काढावी अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी लेखी पत्राद्वारे केली.


केंद्रीय जल आयोगानुसार अलमट्टी धरणामध्ये कुठल्या महिन्यात किती पाणी साठा असावा, याची खालीलप्रमाणे नियमावली घालून दिलेली आहे. 


1) जून अखेर 513 मीटर

2) जुलै पहिल्या पंधरवढ्यात 517.11 मीटर

3) जुलै दुसऱ्या पंधरवड्यात 513.60 मीटर

4) ऑगस्ट पहिल्या पंधरवड्यात 518.66 मीटर

5) ऑगस्ट दुसऱ्या आठवड्यात 519.60 मीटर 







2021 चा महापुर पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे : 


2021 ला जुलै दुसऱ्या पंधरवड्यात अलमट्टी धरणातील पाणी पातळी ही 517 मीटर च्या वर होती. वास्तविक ही पातळी 513 मिटर पाहिजे होती व 60 TMC पाणी ठेवायला हवे होते. पण धरणात त्यावेळी 95 TMC म्हणजे 90% पाणी साठा करून ठेवल्याने व पाणलोट व मुक्त पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने, त्या पाण्याला अडथळा निर्माण झाला व पाऊसाचे पाणी नदी पात्रातून वाहून न जाता ते कोल्हापूर जिल्ह्यात व सांगली जिल्ह्यातील शहरात गावात पसरले व हजारो कोटीचे नुकसान झाले.



नंतरच्या चार पाच दिवसात अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवून पाणी साठा 81 TMC वर आणला व अलमट्टी धरणाची पाणी पातळी 515 मीटर वर आणल्या नंतरच सांगली - कोल्हापूर मधील पूर वाढायचा बंद झाला. पाटबंधारे विभागाने वेळीच या नियमबाह्य पाणी साठ्याला विरोध केला असता तर 21 चा महापूर टाळता आला असता असेही धनाजी चुडमुंगे यावेळी म्हणाले.



कायद्याने डॅम इन्चार्ज ला कायदेशीर जबाबदार धरा : 


भारत सरकार राजपत्र 14 डिसेंबर 2021 धरण सुरक्षा कायदा चॅप्टर 10 आपत्ती व्यवस्थापन कलम 41 अ व ब मध्ये अधिकाऱ्यांनी निष्काळजी पणे काम केल्यास, त्यात शिक्षेची तरतूद केली आहे. त्याआधारे जबाबदारी निश्चित केलेली आहे.


या वर्षी पावसाळ्याच्या काळात पुन्हा अशी चूक आलमट्टी अधिकाऱ्यांनी करू नये म्हणून त्यांना आधीच कायदेशीर जबाबदारीची आठवण करून द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने