कर्तव्यात कसूरी बाबत, शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडरावांना जिल्हाधिकार्‍यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले : पृथ्वीराजसिंह यादव






शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



शिरोळकर नागरिकांच्या विविध मागण्यासंदर्भात युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वात शिरोळच्या छ.शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगेसो यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 4 जून 2025 रोजी सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 



शिरोळ नगरपालिकेच्या कामकाजात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे. अधिकारी म्हणून त्यांचे वर्तन बेजबाबदारपणाचे व अशोभनीय आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांनी काढला आहे. 



शहराच्या पाणीपुरवठा योजनेची १ वर्षाने वाढवुन दिलेली मुदतही २८ जुलै २०२५ रोजी संपणार आहे. या मुदतीत योजनेचे काम कितपत होते हे पाहून, पाणी पुरवठा योजनेचे काम रेंगाळल्या प्रकरणी दोषींवर जबाबदारी निश्चित करून पालकमंत्र्यांच्या समवेत बैठक घेऊन, कोणती कारवाई करावी. यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळच्या शिष्टमंडळास दिले. 




जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना युवानेते पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले की, शिरोळ नगरपालिकेचा मनमानी, बेकायदेशीर आणि भोंगळ कारभार करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना जबाबदार धरून त्यांना निलंबित करावे. शिरोळ पाणीपुरवठा योजनेची मुदत संपूनही योजनेचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या पाणी योजनेचा ठेका रद्द करून कन्सल्टंट बदलण्यात यावा. शिरोळ नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. या मागण्यासंदर्भात प्रशासनाकडून कारवाई व्हावी. अशी मागणी त्यांनी केली.





श्री. दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगूदादा गावडे यांनी शिरोळ तालुका हा पूरबाधित तालुका आहे. महापुराचे संकट आल्यास शिरोळ पालिका प्रशासनाचा कारभार चालविण्याकरिता नगरपालिकेत सक्षम अधिकारी कायमस्वरूपी असावा. याकरिता तात्काळ शिरोळ नगरपालिकेला मुख्याधिकारी द्यावा अशी मागणी केली. 



या संदर्भात शिष्टमंडळासमोर जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलताना म्हणाले, शिरोळ तालुक्याचे मुख्याधिकारी निशिकांतराव प्रचंडराव यांच्या कामकाजात नियमता दिसत नाही. सतत गैरहजर आहेत. त्यामुळे त्यांना या आदेशान्वये सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. शिरोळ पाणीपुरवठा योजनेचे काम रेंगाळले आहे. या प्रश्नी दोषींवर जबाबदारी निश्चित केली जाईल. तसेच नागरिकांच्या हितासाठी पाणी  योजना पूर्ण होणे गरजेचे आहे. पाणी योजने संदर्भात  २८ जुलै २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याची ठेकेदारास मुदत आहे. या मुदतीत योजनेचे काम कितपत पूर्ण होते. याची माहिती घेऊन, पाणी योजना पूर्ण करण्याकरिता ठेकेदार बदलावा..? अथवा या संदर्भात कोणती कारवाई करावी..? याकरिता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच शिरोळकरांच्या ज्या मागण्या आहेत, या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाचे सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्या समवेत आपण बैठक घ्यावी. यामध्ये प्रत्येक प्रश्नावर चर्चा करून ते प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी योग्य तो निर्णय घेऊन पुढे जावे असे सांगितले. 





या बैठकीस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई , माजी सरपंच गजानन संकपाळ , दत्त वाहतुक संघटनेचे अध्यक्ष धनाजीराव पाटील - नरदेकर , तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश उर्फ पांडूरंग माने ,माजी नगरसेवक इम्रान अत्तार , विजय आरगे, आनंदराव माने - देशमुख , राहूल यादव , बाळासाहेब कोळी , बापूसो गंगधर , राजू साळवी , धनाजी माळी , भगवान आवळे , भालचंद्र ठोंबरे , राहूल कट्टी  ,  अनिस चौगुले , निलेश गावडे , संजय चव्हाण, प्रफुल्ल कोळी , दिलीप संकपाळ , महेश माने, रमेश पाटील, भिमराव पुजारी ,उमेश माने, ज्ञानेश्वर कोळी , अजित देशमुख , सुनिल देशमुख , विजयराज कोळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने