" स्मार्ट मीटर नकोच...." स्मार्ट मीटर बसविलेल्यांची लाईट बिले येत आहेत दुप्पट...







प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



राज्य शासनाचा ऊर्जा विभाग व महावितरणतर्फे ग्राहकांचे आहे ते जुने डिजिटल मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. वीज चोरीवर नियंत्रण, रोजच्या रोज किती यूनिट वीज जळाली याची माहिती, इथून पुढे रिडिंग घ्यायला कोण येणार नाही.. अशी कारणे सांगून ठेकेदार स्मार्ट मीटर बसवत आहेत. काही ठेकेदाराचे कर्मचारी तर " आज मीटर बसवून घेतला तर मोफत बसवणार, नाहीतर उद्या 15000 द्यावे लागतील ", असे खोटे सांगून मीटर बसवून जात आहेत.. काही ठिकाणी तर कोणतीही पूर्व कल्पना न देता जुने मीटर काढून घेऊन, नवीन मीटर बसविले जात आहेत. 








पूर्वी पेक्षा वीज बिल येत आहे दुप्पट : 

ज्यांना ज्यांना स्मार्ट मीटर बसविले गेले आहेत, त्यांना कसलाही फायदा तर नाहीच, परंतू खूप मोठा तोटा होताना दिसत आहे. पूर्वीच्या मिटरपेक्षा, स्मार्ट मीटर चे बिल दुप्पट येत आहे. स्मार्ट मीटर च्या नावाखाली शासन स्मार्ट पद्धतीने जनतेची लूट करत आहे, अश्या प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत. धरणगुत्ती, ता.शिरोळ मधील एका ग्राहकाचा मे 2024 मध्ये 105 यूनिट विजेचा वापर झालेला होता व मे 2025 मध्ये स्मार्ट मीटर बसविले नंतर 220 यूनिट झाला असे महावितरण म्हणत आहे. सदर ग्राहकाचे 2 वर्षाचे वीज वापराचे स्टेटमेंट काढून बघितले तरी, एवढा विजेचा वापर कधीच झालेला नाही. त्यामुळे हे स्मार्ट मीटर का बसविले जात आहेत याचा प्राथमिक अंदाज आपल्याला येईल.








महावितरणचा मूळ हेतू हा आत्ता स्मार्ट मीटर बसवून भविष्यात, याच मीटर ला प्रिपेड मीटर करण्याचा आहे. त्यानंतर स्मार्ट मीटर चा रीचार्ज संपल्यानंतर वीज  पुरवठा आपोआप बंद होईल. रीचार्ज करण्याची टांगती तलवार सतत ग्राहकांच्या डोक्यावर राहील. स्मार्ट मीटर बसविताना आवश्यक अभ्यास शासनाने केलेला नाही, ही उघड आहे. सध्यातरी ऑनलाइन व्यवहार करणे, सर्वांना शक्य नाही. प्रत्येकाकडे स्मार्ट फोन नाहीत. त्याचबरोबर मीटर रीडिंग घेणारे व वीज बिल वितरण करणार्‍या कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या जातील,  तो भाग वेगळाच



सदर मीटर बसविण्यासाठी केंद्र सरकारने 60% व राज्य सरकारने 40% अनुदान मंजूर केले आहे. सर्वांचे सध्याचे डिजिटल मीटर चालू व सुस्थितीत आहेत, त्यामुळे सध्या या स्मार्ट मीटर ची काहीच आवश्यकता नाही. असे असताना स्मार्ट मीटर बसविल्यास सार्वजनिक निधिचा अपव्यव होईल. सध्याचे मीटर कचर्‍यात फेकून द्यावे लागेल. त्यामुळे आर्थिक नुकसान होईल. 


ज्यांच्या घरी असे महावितरण चे ठेकेदार स्मार्ट मीटर बसविण्यासाठी येत असतील त्यांनी, सदर मीटरला ठाम विरोध करावा. आहे हे मीटर काढून नेण्याचे ठोस कारण काय..? हा मूळ प्रश्न कर्मचार्‍यांना विचारावा. तरीसुद्धा खोटे सांगून किंवा जबरदस्तीने स्मार्ट मिटर कोणी बसवत असेल तर त्वरित आंदोलन अंकुश संघटनेशी संपर्क करावा, असे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख श्री. धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने