अलमट्टी धरणाच्या ऊंची वाढीच्या विरोधात उभे राहत असलेल्या जन आंदोलनाची दखल घेऊन, मंत्रालय मुंबई येथे काल 21 मे 2025 रोजी विभागाचे मंत्री व संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. कोल्हापूर सांगलीत येणाऱ्या महापुरास अलमट्टी धरण जबाबदारी नाही, ही बैठकीच्या सुरुवातीची शासनाची भूमिका होती. पण आंदोलकांनी याला जोरदार आक्षेप नोंदवून पुराव्यासह अलमट्टी कशी जबाबदार आहे. हे ठासून सांगितल्याने जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना, आंदोलकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर अभ्यास करून 15 दिवसांत अभ्यास करावा अश्या सूचना केल्या. तसेच आंदोलक व महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊन 15 दिवसात पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
तत्पूर्वी आंदोलकांनी निवेदन देऊन, उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने आंदोलक आणि पाटबंधारे वरिष्ठ अधिकारी यांची कोल्हापूर मध्ये बैठक करावी. अशा सूचना कोल्हापूर पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना आदेश केले. या बैठकीला कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातील पालक मंत्री व सर्व आमदार पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावले नसल्याने माजी मंत्री सतेज पाटील हे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. पण त्यांनी बैठक संपल्यावर मंत्रालयाबाहेर संघर्ष समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा करून, सरकार ची भूमिका चुकीची असून या महापुरास अलमट्टी जबाबदार असून या धरणाची उंची वाढवून दिली जाणार नाही सरकार ने उंची वाढीला कायदेशीर विरोध न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असा इशारा दिला.
आंदोलकांच्या वतीने आमदार अरुण लाड,माजी आमदार उल्हास पाटील, इरिगेशन फेडरेशन चे विक्रांत पाटील, आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे, कृष्णा महापूर समिती चे सर्जेराव पाटील,आंदोलन अंकुश चे जिल्हाअध्यक्ष दिपक पाटील, तालुका अध्यक्ष नागेश काळे, डॉ.अभिषेक दिवाण, दिनकर पवार उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा