शिरोळ प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क
राज्य शासनाच्या ऊर्जा विभाग व महावितरणतर्फे ग्राहकांचे आहे ते जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. हे स्मार्ट मीटर बसविण्याचा मूळ हेतु काय..? व जुन्या मीटर मध्ये अडचण काय आहे...? हे निर्णय घेणार्या कोणालाच सांगता येत नाही.
वीज कायदा 2003 नुसार ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा मीटर निवडण्याचा अधिकार आहे. परंतू गेल्या 20 वर्षात महावितरण कडून 3 प्रकारचे मीटर बसविण्यात आले आहेत. 2003 पासून इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले, त्यानंतर डिजिटल मीटर बसवण्यात आले आणि आता अनावश्यक भार टाकून प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घालण्यात आला आहे. मग पूर्वीच्या अनामत रकमेचे काय...? बदललेल्या मीटरचे मूल्य काय...? याचे उत्तर कोण देणार...?
आज शिरोळ येथील संगमनगर भागात, ठेकेदाराकडून ग्राहकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचे काम चालू होते. एखाद्या ग्राहकाच्या घरात कोणीही नसल्यास परस्पर जुने मीटर काढून, स्मार्ट मीटर बसवून जात आहेत. सदर स्मार्ट मीटर बसविताना ठेकेदारच्या कर्मचार्यांकडून " आजच बसवून घेतला तर मोफत... नाहीतर भविष्यात 15000 रुपये भरून बसवून घ्यावे लागेल.." " सगळेच बसवून घेत आहेत." " रीडिंग घ्यायला आता ईथुन पुढे कोण येणार नाही " असे सांगून ग्राहकाला फसवून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम चालू होते.
ग्राहकांच्या तक्रारी आल्या नंतर आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे व त्यांच्या टिम ने घटनास्थळी भेट देऊन, ठेकेदाराच्या अधिकारी, कर्मचार्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. अरेरावी करणार्या अधिकार्यांना त्यांची जागा दखवून दिली. महावितरण च्या अधिकार्यांना जागेवर बोलावून त्यांनाही ताकीद देण्यात आली. व बसविलेले सर्व स्मार्ट मीटर काढून नेण्यास भाग पाडले.
यावेळी धनाजी चुडमुंगे म्हणाले, आम्ही या बाबतीत वारंवार महावितरणला पत्रव्यवहार केलेला आहे. ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवून घ्यायचे आहेत, त्यांना अवश्य बसवावे. पण ग्राहकाच्या इच्छेविरुद्ध खोटे नाटे सांगून स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न महावितरणने व ठेकेदाराने करू नये. अश्याप्रकारे आम्ही कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवून देणार नाही. ज्या ग्राहकांना असे न सांगता, किंवा जबरदस्तीने मीटर बसविण्यात आले आहेत, त्यांनी आंदोलन अंकुश शी संपर्क करावा.
टिप्पणी पोस्ट करा